पर्याय परंपरा व पर्यावरणाचा ऱ्हास करणार नाहीत याची खबरदारी घ्या -श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
19 Oct 2024, 8:33 AM
(मनोज भगत) ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
आज घरी माता भगिनी असतांना व त्या उत्कृष्ट भोजन बनवीत असतांना सुद्धा लोक हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता जातात . याचे एकमेव कारण आहे की, तिथे भोजना करता अनेक पदार्थाचे पर्याय उपलब्ध असतात . मग ते शिळे व सडके का असेनात .घरी मात्र स्वच्छता व शुद्धतेची काळजी घेत पारंपारिक पद्धतीने अत्यंत प्रेमाने बनविलेले आरोग्यदायी , पौष्टिक व पाचक पदार्थ खावे लागतात ते मात्र आजच्या तरुण पिढीला आवडत नाहीत. पर्याय उपलब्ध करून देण्याला आमचा विरोध नाही परंतु कुठलाही पर्याय हा परंपरा प्रकृती व पर्यावरण याचा ऱ्हास करणार नाही याची खबरदारी प्रत्येक पर्याय देणाऱ्या परिवर्तवाद्यांनी घ्यावी असे परखड मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी व्यक्त केले.ते आज श्री संत वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ या ठिकाणी दर्शन व सहलीच्या निमित्ताने आलेल्या विद्यार्थी व पालकांशी अनोपचारिक चर्चा करीत असताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजच्या तरुणाला कुठल्याही क्षेत्रात नियत गोष्टीपेक्षा पर्यायच अधिक आवडतो. म्हणूनच तो आवश्यकतेपेक्षा अनावश्यकतेकरिता पैसा व वेळ जास्त प्रमाणात खर्च करीत असतो. म्हणूनच आज लोक पोट मागते ते नाहीतर जीभ मागते ते द्यायला लागल्यामुळे केवळ जिभेचे चोचले पुरविण्याच्या दृष्टीने हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढतांना दिसत आहे . परिणामी आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे. अर्थातच याला कारणीभूत व्यवस्थेनी उपलब्ध करून दिलेला पर्यायच आहेत.तद्वत परमार्थिक क्षेत्रात सुद्धा नियत परंपरेला जर पर्याय उपलब्ध करून दिले, तर लोक परंपरे पेक्षा पर्यायाला प्राधान्य देऊन परिणामी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून संप्रदायांमध्ये घुसखोरी करणारे लोक नियतपरंपरा मोडीत काढतील यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून नियम पालनाच्या दृष्टीने सुज्ञानी कर्तव्य कठोर होणे अत्यंत गरजेचे आहे. जगात अशा काही गोष्टी आहेत की ज्यांना पर्यायच नाही . जसे पाण्याच्या क्षेत्रात समुद्राला, प्रकाशाच्या क्षेत्रात सूर्याला, ज्ञानाच्या क्षेत्रात वेदाला, व्यापकतेच्या क्षेत्रात आकाशाला, सौंदर्याच्या क्षेत्रात देवाला, औदार्याच्या क्षेत्रात संतांना , प्रेमाच्या क्षेत्रात मातृप्रेमाला पर्याय नाही. तद्वत वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ व काकड्याला पर्याय नाही. म्हणून आता कार्तिक स्नानानिमित्त वर्षानुवर्ष परंपरेने गावोगावी चालू असलेल्या काकडा आरती मध्ये " बाळा प्रौढा आणि मुग्धा " या सगळ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करून केवळ चार-दोन लोकात संपन्न होणाऱ्या त्या कार्यक्रमात संख्यात्मक दृष्टीने वाढ करणे हे परिवर्तन करता येईल . परंतु त्याला दुसरा कुठलाही पर्याय देणे उचित होणार नाही असे अत्यंत पोटतिडकिने सांगितले . असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.
Post Views: 130